अधिक मास संबंधी माहिती

🌹श्री गुरुमहाराज समर्थ🌹
🌹अधिक मास🌹

अधिक मास संबंधी संकलित माहिती देत आहे.

यासंबंधी पौराणिक कथा आहे .
एकदा श्रीविष्णु याना नारदमुनी म्हणाले, दरवर्षी फक्त बाराच महिने असतात. मग दर तीन वर्षांनी हा तेरावा महिना कसा येतो ? ते मला कृपा करून समजावून द्या.

तेव्हा नारायण म्हणाले, विश्वाचे कल्याण अगर अकल्याण हे सत्कर्माच्या आणि दुष्कर्माच्या प्रमाणांवर अवलंबून असते.

आजकाल दुष्कृत्याचेच प्रमाण वाढल्यामुळे, ते पाप आपल्याला सहन होत नाही, अशी बाराही महिन्यांची केव्हापासूनची तक्रार होती. त्या पापाचे जड ओझे बारा महिन्यांच्या पोटांत मावेनासे झाले.
त्यामुळे त्या बाराही महिन्यांनी आपापल्या पोटांतील पापाचा फक्त तिसराच हिस्सा बाहेर काढून टाकला. आपला पापभार तेवढा कमी केला.

परंतु बाराही महिन्यांनी काढून टाकलेल्या त्या पापभागांपासून तेरावा महिना म्हणजेच अधिकमास उत्पन्न झाला. तो पापमय असल्याने त्याला मलिनमास किंवा मलमास असे नाव पडले.

अधिकमास पाळणाऱ्या स्त्रीपुरुषांनी महिनाभर एकभुक्त राहून पुरुषोत्तम व्रत करावे. संबंध अधिकमासांत प्रत्येक दिवशी अधिक मास पोथी सकाळी, दुपारी व संध्याकाळी वाचावी अगर ऐकावी.

निदान सोयीप्रमाणे एकदातरी तसे करावे.

वैदिक काळात अधिक महिन्याला संसर्प, मलीमलूच असे म्हटले गेले आहे.अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास,धोंड्याचा महिना असेही म्हणतात.
अधिक महिन्याचे संदर्भ वैदिक साहित्यात आढळतात. सौर कालगणना वेदकाळात अस्तित्वात होती आणि चांद्र कालगणना ही अस्तित्वात होती. वैदिक ऋषींना हे लक्षात आले की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक पडत होता. हे अंतर भरून काढण्यासाठी काही दिवस अधिक घ्यावे लागले. वैदिक काळातच हे अंतर भरून काढण्यासाठी दर ३ वर्षांनी कालगणनेमध्ये ३० दिवस अधिक घेतले गेले. हाच तो अधिक मास होय.

चैत्रापासून आश्विन महिन्यांपर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते, व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक वा फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो. त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्र महिने असतात, अगोदरचा अधिकमास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. एखादा विशिष्ट महिना अधिकमास आला की १९ वर्षांनंतर तोच महिना अधिकमास म्हणून येऊ शकतो

ज्या चांद्र महिन्यात सूर्याचे एका राशीतून पुढच्या राशीत संक्रमण होत नाही, तो महिना अधिक महिना मानतात आणि त्यानंतरचा निज महिना. याच नियमाने ज्या चांद्र महिन्यात सूर्य दोन राशींनी पुढे सरकतो, त्या महिन्याला क्षयमास म्हणतात.

पौर्णिमेला महिना संपतो अशा पद्धतीच्या पंचांगात निजमासाच्या एका (कृष्ण) पक्षानंतर अधिक मासाचे दोन पक्ष येतात, आणि त्यानंतर निजमासाचा शुक्ल पक्ष (दुसरा पंधरवडा). त्या पंचांगातला अधिक मास आणि अमान्त पद्धतीच्या पंचांगातील अधिक मास एकाच वेळी असतात.

प्रत्येक महिन्यात दोन (वा अधिक) एकादश्या असतात; त्यांतल्या २४ एकादश्यांपैकी प्रत्येकीला स्वतंत्र नाव असते. अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादश्यांना ‘कमला एकादशी’ हेच नाव असते.

ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो.

अधिक मासात निजमासांप्रमाणेच विनायकी आणि संकष्टी या दोन्ही चतुर्थ्या असतात.

पूर्वी याचे मल मास असे नाव होते। मल मासात मंगल कार्ये, काम्य व्रते इत्यादींचा त्याग करत होते।. त्यामुळे या मासास इहलोकात अनेक निर्भत्सनांना सामोरे जावे लागले. त्यामुळे व्यथित होऊन तो मास वैकुंठात विष्णूकडे गाऱ्हाणे घेऊन गेला. विष्णूने त्यास गोकुळात कृष्णाकडे पाठविले. तो कृष्णास शरण गेला. कृष्णाने त्या मासाचे नाव बदलून ‘पुरुषोत्तम मास’ असे ठेविले अशी कथा प्रचलित आहे.या मासात जे श्रद्धाभक्तियुक्त राहून उपासना, कर्मे, व्रते व दाने करतील त्यांना पुण्य मिळेल असेही त्यास वचन दिले.

अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. या विशिष्ट महिन्यात विष्णू देवतेच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. . भागवत पुरणाचे वाचन, भागवत कथा सप्ताह, स्नान, दान, जप यांचे आचरण या महिन्यात केले जाते. ब्राह्मणांना भोजन, दान देणे यासाठीही या महिन्यात विशेष उपक्रम केले जातात.

अधिक महिन्यात विविध मंगल कृत्ये करू नयेत असा संकेत रूढ आहे, त्यामुळे या महिन्यात विवाह, मुंज, बारसे असे संस्कार केले जात नाहीत. तसेच नव्या वस्तूंची खरेदी अथवा नव्या कपड्यांची खरेदी अशा गोष्टी न करण्याची परंपरा समाजात रूढ आहे

२०२३ मध्ये, मराठी श्रावण महिना १८ जुलै २०२३ पासून सुरू होईल आणि १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत असेल. अशा प्रकारे, यावेळी श्रावण ५९ दिवसांचा असेल. या दोन श्रावण महिन्यांची विभागणी अधिक श्रावण आणि निज श्रावण अशी केली जाते. अधिक श्रावण महिना १८ जुलै पासून सुरू होईल आणि १७ ऑगस्टपासून निज श्रावण महिना सुरू होईल तो १५ सप्टेंबरला संपेल. अधिक आणि निज असे दोन श्रावण महिने असल्याने यंदा ८ श्रावण सोमवार असतील. त्यामुळे शंकराचा श्रावण सोमवार उपवास करणाऱ्यांना ८ सोमवार व्रत-उपवास करावे लागतील.

अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. पुरोषत्तम म्हणजे नारायण. मुलीचे लग्न केले जाते त्यावेळी विवाह प्रथेनुसार जावयाला नारायण असे संबोधले जाते. त्यानुसार विवाह संस्कार पार पडतात. त्यामुळे मुलीच्या आई वडिलांसाठी जावई हा नारायण असतो

शास्त्रानुसार जावयाला तीस तीन अनारसे, म्हैसूर पाक किंवा बत्तासे असे सच्छिद्र पदार्थांचे वाण देण्याची पद्धत आहे.
अधिक मासाचे निमित्त, म्हणून सुवासिनींनादेखील जोडवी बदण्यास निमित्त मिळते.

अनेक ठिकाणी अधिक मासाला धोंड्याचा महिना असे म्हटले जाते. नियमित सुरू असलेल्याल्या कालगणनेत आडमुठ्यासारखा, मध्येच आलेल्या दगडासारखा (धोंड्यासारखा) आलेला महिना म्हणून धोंड्याचा महिना असेही एक मत आहे. मात्र, धोंडा आणि अधिक मास यांना जोडणारा एक खाद्यपदार्थ आहे, त्याला धोंडा' म्हटले जाते. नागपंचमीला पुरण घालून चौकोनी पदार्थ केला जातो, त्यालादिंड’ म्हणतात, तोच पदार्थ मराठवाड्यात गोल लाडवासारखा किंवा धोंड्यासारखा वळून उकडवला जातो. त्याला धोंड्याचा नैवेद्य म्हणातात. जेवताना जावयाला आग्रहाने धोंडे खाऊ घातले जातात आणि त्याच्या रुपाने नारायणाने धोंड्यांचा नैवेद्य स्वीकार केला, असे समजतात…

या महिन्यात गहू, तांदूळ, मूग, तीळ, वाटाणा, राजगिरा, काकडी, केळी, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, खरपूस, पिंपळ, जिरे, कोरडे आले, खडे मीठ, चिंच, सुपारी, फणस. तुती, मेथी पदार्थांचे सेवन करावे. या महिन्यात प्रवास करणे, भागीदारीची कामे करणे, कोर्ट कचेरी काम करणे, बियाणे पेरणे, झाडे लावणे, दान करणे, सामाजिक कामे करणे, सेवा कार्य करणे..बँकिंग क्षेत्रात कामे उरकून घेणे यात दोष नाही

लग्न कार्य मुंज साखरपुडा किंवा अन्य कोणतेही मंगल कार्य अधिकमासात करू नये. या महिन्यात विवाह, नामकरण, अष्टकादी श्राद्ध, मुंडन, यज्ञोपवीत, कान टोचणे, गृह प्रवेश यासारखे शुभ कार्ये करणे टाळावे.

या अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि मांसाहारापासून दूर राहावे

श्री गुरुमहाराज समर्थ🌹
🙏🙏🙏🙏🙏🚩🚩

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top