Tag: बालपण

  • जयशंकर व मेवाड हॉटेल – आश्चर्यकारक संबंध !


    मेवाड हॉटेल – औरंगाबाद स्पेशल !

    औरंगाबाद मधील गुलमंडी वरील मेवाड हॉटेल कुणाला माहिती नसेल असा जुन्या पिढीतला किंवा अलीकडच्या पिढीतला माणूस विरळच. …


    अजीब दास्ताॅं है ये कहां शुरु कहां खतम….
    असं या मेवाड हॉटेलच्या इतिहासाबाबत किंवा माहितीबाबत म्हणता येईल ! आश्चर्यचकित करून टाकणाऱ्या दोन व्यक्तींचा उल्लेख मेवाड हॉटेलच्या माहितीबद्दल किंवा इतिहासा बद्दल येथे मांडण्याचा प्रयत्न आहे. मला असलेल्या माहितीत भर टाकताना अनेक गोष्टींची शहानिशा व‌ आमचे मित्र, मेवाड लॉजचे मालक शंकर परमानंदसेठ जोशी तसेच सोमण शास्त्री यांचे नातेवाईक सुभाष आपटे ( माजी व्यवस्थापक – देवगिरी ना.सह. बॅंक) यांच्या कडूनही झाली आहे.

    मध्यप्रदेशातील इंदोरच्या होळकरांकडे भांडारकर नावाचे गृहस्थ मोठ्या पदावर होते. या भांडारकरांकडे एक हिंदी भाषिक जोशी व्यक्ती रसोईची म्हणजे स्वयंपाकाची व्यवस्था पाहत होते. या जोशींचा मुलगा म्हणजे परमानंद जोशी. परमानंद जोशीं वडिलांबरोबर भांडारकरांच्या घरातील एक लहान सदस्यच झाला होता. ह्या मुलाला तेथे राहण्याचा आणि काम करण्याचा कंटाळा आला म्हणून इंदूर सोडून आला तो औरंगाबादला !
    रेल्वे स्टेशन वरील सूर्यप्रकाश नावाच्या एका हॉटेलमध्ये त्यांला काम मिळालं. याच हॉटेलमध्ये मोतीवाला हुंडेकऱ्याच काम पाहत होते. गुलमंडीवर एक पोलिस इन्स्पेक्टर हॉटेल चालवत होता. ओळखी ओळखीतून त्यांच्या हॉटेलमध्ये परमानंद जोशी कामाला लागले. या तरूण मुलामधील चमक आणि प्रामाणिकपणा पाहून हॉटेल मालकाने त्याला बीन भांडवली २५ टक्क्यावर working partner करून घेतले. प्रामाणिकपणा, सचोटी आणि व्यवसायिक हुशारीच्या बळावर परमानंद जोशींनी ही भागीदारी ५० टक्क्यांपर्यंत नेली.

    हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे वारे जोरात वाहत होते. गुलमंडीचे ठिकाण औरंगाबादच्या केंद्रस्थानी असल्यामुळे येथे अनेक सभा, चळवळी व्हायच्या. हा भाग तेव्हा जवळपास अशांतच असायचा. अशा मध्ये १९४७ साली या हॉटेल जवळ कृष्णा नावाच्या एका तरुणाचा निजामाच्या रोहिल्यांनी खून केला. या कृष्णाच्या अंत्ययात्रेला औरंगाबाद मधील दहा हजार लोक त्यावेळेस हजर होते असे म्हणतात. गुलमंडीवरचं वातावरण तंग असायचं. अशात हॉटेल दोन तीन महिने बंद राहिलं. परमानंद सेठनी मोठ्या हिमतीने आपल्या एका मित्राच्या भागीदारीत हे हॉटेल पूर्णपणे चालवायला घेतले. हे भागीदार होते जगन सेठ. तरी पण हॉटेल काही केल्या चालेना.

    पूर्वी मुंबईमध्ये ट्राम सिटीबस सारख्या चालायच्या. मुंबईच्या या ट्राम मध्ये सोमण शास्त्री नावाचे गृहस्थ कंडक्टर म्हणून काम करत होते. काम करता करता त्यांच्या मनात विरक्तीची भावना आली. निवृत्ती स्वीकारली. आपल्या जवळ असलेलं सगळं दान करून काही अल्प-स्वल्प किमतीत विकून या गृहस्थांनी भारत भ्रमण सुरू केलं. भारतभर फिरून ते औरंगाबादला विसावले. संपूर्ण भारत पालथा घातल्यामुळे सोमण शास्त्रीं कुठल्याही गावाची, तेथील स्थळाची माहिती, त्या गावचे वैशिष्ट्य अतिशय व्यवस्थितपणे सांगायचे. आपल्या या संतांच्या भूमीचा, मातीचा गुणच असा काही आहे की एखाद्या माणसांमध्ये असलेले सद्गुण, दैवी भावना येथे आल्यावर अधिक दृढ होत जातात, उपकारक होत जातात असा इतिहास आहे.
    केसरसिंग पुऱ्यातील (जिल्हा न्यायालया मागे) महादेव मंदिरात या सोमण शास्त्रींनी आश्रय घेतला. पूजा, अर्चा ध्यान आणि प्रबोधन असं कार्य सुरू झालं.

    मेवाड हॉटेल पाहिजे तसं चालत नव्हतं यासाठी काय करावं या विवंचनेत परमानंद सेठ असताना कुणा एका व्यक्तीने त्यांना सोमण शास्त्रींंना भेटण्याचा सल्ला दिला. आणि सांगितलं की या व्यक्तीने जर तुम्हाला राम राम केला तर तुमचा ऊद्धार ठरलेला आहे. परमानंद सेठ सोमण शास्त्रींकडे गेले. त्यांच्यासमोर हात जोडण्याच्या आधीच सोमण शास्त्रींनी त्यांना राम राम केला. परमानंद सेठनीं त्यांना त्यांच्या हॉटेलवर येण्यासाठी आग्रह केला. सकाळी चार वाजता जेव्हा हॉटेल उघडाल तेव्हा मी तेथे येऊन बसतो असे ते म्हणाले.

    दिव्यत्वाची प्रचीती

    दिव्यत्वाची प्रचिती आल्या प्रमाणे परमानंद सेठनी सकाळीच चार वाजता हॉटेल उघडले ‌ आणि समोर गुडघ्यापर्यंत नाडीची विजार घातलेले (आजच्या बरमोडा सारखी), खांद्यावर एक शुभ्र पांढरा पंचा असलेले सोमण शास्त्री दत्त म्हणून तेथे आधीच हजर होते. परमानंद सेठनी त्यांना थेट गल्ल्यावरच बसवले. गल्ल्यावर बसल्या बसल्या गुलमंडी भागातील एक गृहस्थ, खांडरे हे चहा प्यायला हॉटेलमध्ये आले. त्यांना चहा दिल्यावर ते बिल द्यायला काउंटरवर गेले तर सोमण शास्त्रींनी त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं रोज सकाळी येऊन आपण चहा प्यायचा आणि बिल द्यायचं नाही.
    परमानंद सेठ मागच्या बाकावर बसून कुठल्याशा नवीन दिव्यत्वाचा साक्षात्कार घेत होते. साधारण साडेसात आठ वाजेपर्यंत सोमण शास्त्री ‘जय शंकर, जय शंकर’ म्हणत गल्ल्यावर बसले होते. काम करणाऱ्यांची धावपळ चालू होती कारण गिर्‍हाईकांची वर्दळ वाढली होती. सोमण शास्त्रींनी गल्ल्यावरून हात फिरवला आणि जय शंकर म्हणत ते तडक निघून गेले. जाताना रात्री येतो म्हणून सांगून गेले.


    रात्री दहा साडेदहा वाजता आल्यावर त्यांच्या हातात एक लोह चुंबक होते. त्या लोहचुंबकाने त्या काळी असलेली नाणी (खुर्दा – सुटे पैसे) वेगळे करत रात्री अकरा वाजता त्यांनी ती पूर्ण रक्कम ‘जय शंकर, जय शंकर’ म्हणत समोर मोजून मांडून ठेवली. परमानंद सेठ आणि जगन सेठचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. डोळ्यात तरळलेल्या अश्रूंसह त्यांनी सोमण शास्त्रींना नमस्कार केला.

    शंकर महाराज

    सोमण शास्त्री जय शंकर जय शंकर म्हणत टांग्याबिंग्याची वाट न पहाता किंवा अपेक्षाही न करता पायी निघून गेले. आता सोमण शास्त्रींना सगळे जयशंकर महाराज म्हणू लागले होते.
    हॉटेलमधील गिऱ्हाईकी वाढली. रोज सकाळी खांडरे येऊन चहा पिऊन जायचे. जय शंकर महाराजांना नमस्कार करायचे आणि त्यांचाही नमस्कार स्वीकारायचे.
    हा शिरस्ता खूप दिवस चालू होता. खाण्यापिण्याची कुठलीही इच्छा जयशंकरजींनी कधी व्यक्त केली नाही.
    एक दिवस हॉटेलमध्ये जिलेबी तयार झाली. महाराज जिलेबी खाणार का? असं विचारल्यावर त्यांनी ताज्या जिलेबीची थाळी समोर ठेवायला सांगितलीआणि त्यांनी ती सगळी जिलेबी संपवून टाकली. कोणी काही बोललं नाही. महाराज हसत म्हणाले अरे आता गिऱ्हाईकासाठी जिलेबी संपली ! दोघं मालक म्हणाले महाराज आपण दुधाने अंघोळ केली तरी आम्ही काही म्हणणार नाही!!

    एखाद्या सद्-गृहस्थाची कृपा, सद्भावना म्हणा किंवा त्यांच्यातील निर्मळ दिव्यत्व असो, ते कुणाच्या तरी प्रगती, समृद्धीचा दुवा असते, फळ ठरते! फक्त असावी लागते ती तुमची निष्ठा, आदर अन् विश्वास !!
    गुलमंडी वरील मेवाडचा कारभार, व्यवसाय ऊभारी घेऊ लागला होता. सत्तर-ऐंशी लोक काम करू लागले होते. हॉटेलचे व्यवस्थापन उत्तम जमले होते. तसेच कामगारांमध्ये शिस्त रुजवली गेली होती. प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची कल्पना होती. मला आठवतं विठ्ठलराव सपकाळ नावाचे सडपातळ पण कडक स्वभावाचे गृहस्थ सगळीकडे लक्ष ठेवून सारखे हॉटेलभर फिरत असत. काम करणाऱ्या मुलांना गिऱ्हाईकाला काय हवं काय नको पासून साफसफाई व बारीक सारीक गोष्टींची जाणीव करून देण्यात ते तत्पर होते. सुपरवायझरच म्हणा ना ! अजून एक गृहस्थ कधी प्रवेशद्वारा जवळ कधी मागच्या बाजूला निघणाऱ्या दाराजवळ शांतपणे लक्ष ठेवून उभे असायचे. त्यांचं नाव होतं खेडला. परमानंदसेठ पासून त्यांचे चिरंजीव शंकरसेठनी व्यवसाय पाही पर्यंत ते नेहमी बरोबर असतं. नागेश्वर वाडीत मेवाड लॉज शेजारच खेडलानी स्वतःचं मोठ घर आहे. तसेच मुलांनी छान दुकान थाटली आहेत.
    वरील विवेचवा वरून मेवाड हॉटेलची व्यवस्था अतिशय अनुकरण करण्यासारखी होती हे लक्षात आलंच असेल. खरोखर हे व्यवस्थापन समजून घेण्यासाठी वा अभ्यास करण्यासाठी, बरेच जण, मॅनेजमेंट तज्ञ या हॉटेलच्या मालकांना भेटायचे. व्यवस्थापना बद्दल विचारायचे. या व्यवस्थापन परंपरेतून किंवा या हॉटेल मधिल व्यवस्थापनाचे तंत्र अवगत झालेल्या बऱ्याच जणांनी, काम करणाऱ्यांनी औरंगाबाद मध्ये व आसपासच्या गावांमध्ये स्वतंत्र हॉटेल्स टाकले.
    मालकांना कामगारांबद्दल आत्मीयता तर होतीच तसाच त्यांच्यावर वचक पण होता. या हॉटेलमध्ये कधी संप झाल्याचे मी ऐकले नाही.
    श्रावणातील एका सोमवारी मेवाड हॉटेलमध्ये सत्यनारायणाची पूजा, तिर्थ-प्रसाद असायचा. शंकर जोशींनी नागेश्वर वाडीत मेवाड लॉज सुरू केल्यावर श्रावणातील पूजा आणि ओळखीच्या मित्र-मंडळीसाठी भोजन सुरू केले.

    परलोक गमन


    सोमण शास्त्री-जयशंकरजींच्या परिचयातील औरंगाबाद मधिल रामभाऊ दातार, आपटे खानावळ, कुंभार वाडा, रामभाऊ जोशी, अभ्यंकर. इत्यादी कुटुंबातील सदस्यांनाही त्यांचे मार्गदर्शन, आशीर्वाद व त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. शेवटी रामभाऊ जोशी, स.भु. कॉलनी, यांच्या घरीच १९७८-७९ (अंदाजे) सोमण शास्त्रींनी देह ठेवला. त्यांचे अजून एक निकटवर्तीय दत्तात्रय खांबेटे यांनी अन्य सर्व संस्कार केले.
    एका अज्ञात देवमाणसाने औरंगाबाद मध्ये येऊन निरपेक्ष वृत्तीने जमेल तशा प्रकारे आपली दिव्य शक्ती प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची भावना, धारणा असणाऱ्यांचे बस्तान बसवण्यासाठी वापरावी हे आश्चर्यकारक व अप्रुपच वाटत नाही का?

    दिव्यत्वावरची श्रद्धा आणि श्रद्धेचं फळ म्हणजे मेवाड हॉटेल!

    आपण सर्वांनी या अमृततुल्य हॉटेलमध्ये घेतलेल्या चहा पासून दाक्षिणात्य व अन्य पदार्थांचा, जेवणाचा घेतलेला आस्वाद काही औरच होता!
    पुढे या भागिदारांनी शहागंज भागातही मेवाड हॉटेल सुरू केले. ‘मेवाड’ हा शब्द जणू खाण्यापिण्याचं एक विश्वसनीय प्रतिक ठरलं होतं. स्वादिष्ट – चवदार पदार्थ, स्वच्छता-नीटनेटकेपणा व माणुसकीचे ठिकाण ही ठरलं! नागेश्वर वाडीतील मेवाड लॉज हे परमानंद सेठचे अजून एक नंतरचे प्रतिष्ठान. पुढच्या पिढीने, दोन्ही भागीदारांच्या नात्यातील व्यक्तींनी ‘मेवाड’ हा शब्द अंतर्भूत धरून नवनवीन हॉटेल्स वेगवेगळ्या भागात सुरू केली. या व्यवसायाने दोघा भागीदारांच्या पिढ्यांना समृद्ध केलं. आज गुलमंडीवरचे मेवाड नसले तरी मेवाड हॉटेल मधील पदार्थांची चव आणि आठवणी मनात कायम आहेत.



    या बद्दल अधिक माहिती असणारांनी जरूर टाकावी. कमेंटमध्ये

  • Time Less : Missing Moments

    टाईमलेस!


    पालथ्या तळव्याला थोडसं चाटून “टॅम्प्लीज” केलंय का कधी? 🤛🏻 लपाछुपीत “धप्पाsss” म्हणून बोंबलायला मिळालंय का? 😹 “नॉटॅठोम” म्हणताना उकळ्या फुटलेल्या आठवतात का? “कटाsssप” म्हणून एखाद्याला डावातून हाकललंय का कधी? गटारीत गेलेला बॉल बाऱ्या लावून काढलाय का कधी? 🎾

    हे सगळं वाचताना जर दिल गार्डन गार्डन होत असेल, तर बिंगो! 💐 तुमचं बालपण कमाssल भारी होतं! परवा घरी अशीच एक मैफल रंगली आणि नुसत्या जुन्या आठवणींनीच्या रानात फेरफटका मारून यायला झालं. 😇

    आपल्या लहानपणीचे खेळ म्हणजे कसे लाइव्ह असायचे ना! उन्हाळी सुट्टी म्हटलं की तर आमचा नुसता धांगडधिंगा असायचा. 🪄नुसता ‘बझ’ असायचा सगळ्या वातावरणात..! भूक, तहान, झोप आणि घरदार विसरून दिवसभर नुसता खेळ, खेळ आणि खेळच मांडलेला असायचा.

    रम्य त्या बालपणी, म्हणजे जेव्हा ‘खेळा’ चा ‘स्पोर्ट्स’ झाला नव्हता तेव्हा आम्ही “डब्बा एक्सप्रेस” (ॲक्चुअली ऐसपैस) हा अतरंगी खेळ खेळायचो. रस्त्यावर खडूने एक गोल आखून, त्या गोलात उभं राहुन जितक्या लांब फेकता येईल तितक्या लांब तो डब्बा फेकायचा. ज्यावर राज्य आहे त्याने पळत जाऊन तो डब्बा आणून पुन्हा गोलात ठेवायचा. तो आणेपर्यंत बाकीचे गडी लपायचे. मग एकेकाला हुडकून (होय.. शोधायचो नाही.. हुडकायचो… :)) त्याच्या नावाने डब्यावर पाय ठेवून “अमक्याचा डबा-ऐसपैस” असं ओरडायचं. या लपंडावात धप्पा देणे म्हणजे गोलातला डब्बा लाथ मारून उडवणे. जाम राडा घालायचो यार गल्लीत! 💃🏻

    ऑल टाईम टॉप “लपंडाव” खेळताना लपणारे देखील हुशार! एकमेकांचे शर्ट आणि टी-शर्ट बदलून लपायचे. बिचाऱ्या गड्यानं चुकीचं नाव घेतलं की मग अंडं. नाहीतर सगळे मिळून त्याला धप्पा द्यायला टपलेलेच असायचे. फार वेळ एखादं बेनं सापडलं नाही तर शेवटी शेवटी त्याला शोधायचा डाव घरातल्या लोकांवर यायचा! 🙆🏻‍♀️

    आणि एक रेट्रो फन म्हणजे “आबाधबी उर्फ धपाधपी”! लै म्हन्जे..लै भारी गेम… त्यात आम्ही प्लस्टिक चा बॉल वापरायचो…जी पाठ शेकुन निघायची..:) चिक्कीबॉल आणि आबाधबी हे तर लईच डोंगर व्हर्जन होतं. चिक्कीच्या वाळक्या शेंगा गोळा करायच्या आणि त्याची चेचुन चेचुन तेल लावून पेस्ट बनवायची. त्या पेस्टचा टणक गोळा बनवायचा. मग त्याच्यावर चिंध्या गुंडाळायच्या आणि वर एक चांगले कापड गुंडाळून वाकळेच्या जाड दोर्‍याने शिवायचो. त्याने धबाधबी खेळायची. खतरोंके खिलाडीच आम्ही जणू! पण धबाधबी खेळण्यापेक्षाही चिक्कीबॉल बनवणे माझे आवडते काम आणि माझी स्पेशालिटी! 🎾

    आणि “आडमिट किडा” आठवतोय का? राज्य असलेला (तेच ते आजकालचं ‘डेन’ असलेला) गडी एखादं मुक्काम पोस्ट सांगायचा. ते ठिकाण लोखंडाच्या वस्तूंना शिवत शिवत गाठायचं. ⛳प्रकरणात जर एखादा पाण्याचा पाइप वगैरे हाताशी आला की मग निवांत. त्यात मुद्दाम आम्ही खिशात खिळे वैगेरे लपवुन ठेवायचो..आणि वस्तु नसली कि मुद्दाम रस्त्यात फेकायचो. लोखंडच शिवलंय याचं प्रूफ दाखवायला मी तर खिशात मॅग्नेट (लवचुंबक ?🧲🤣) सुद्धा बाळगायचे.

    मग त्याचाच सावत्र भाऊ “टीपी टीपी टॉप टॉप”, व्हॉट कलर यू वाँट”? यायचा. काहीतरी भारी रंग सांगायचा शिवायला, सोनेरी, चंदेरी वगैरे. हा खेळ ठरला कि पोरं घरी जाऊन मल्टीकलर्ड कपडे घालून यायची म्हणजे जास्त लांब पळायला नको. 🪂

    क्रिकेट खेळायला तर १० बाय १२ ची बोळ वजा जागा पण पुरायची. 🏏 धुणं धुवायचं धुपाटणं घेऊन, सतराशे साठ नियम करून खेळायचो. एक टप्पा आऊट, कंपाऊंड बाहेर मारला कि आऊट, काचेला / गाडीला कसापण लागला कि आऊट, व्हरांड्यात २डी, भिंतीला बाऊंड्री आणि डायरेक्ट कंपौंडला सिक्सर! लई झांगडगुत्ता असायचा लेको! 🤯

    आणखी एक लो बजेट खेळ असायचा – “दही भात द्या, पुढंsss जावा..!” घरातल्याच ४ कोपर्‍यात उभे राहयचे नी ज्याच्यावर डाव असेल त्याने हाताचा पसा करत मागायला यायचे. यावर कोपर्‍यातल्याने “त्या घरी जा” म्हणून लांब पाठवायचे नी मग २ कोपर्‍यातल्यांनी तेवढ्यातल्या तेवढ्यात जागा बदलायची… बदलताना पकडले तर आऊट! कायच्या काय खेळ, पण मजा यायची. 😻

    ऑलंपिक लेव्हलचं नेमबाजीचं स्कील लागणारा आणि एक खेळ होता! तुम्हाला “वश्टर” 🪃 आठवतोय का? आधी कचायचे. मातीत एक रिंगण आखायचे रिंगणापासून पाच-सहा फुटांवर एक खच्च्या (रेघ) काढायची. प्रत्येकाने ठरलेली रक्कम किंवा एक / दोन अशा ठरलेल्या कोया / काचा डावावर लावायच्या.आणि एकेकाने त्या खच्च्यावरून ते त्या रिंगणात टाकायचे. एकही कोय् /नाणं / काच रिंगणाच्या बाहेर गेले की आऊट! आपण खच्च्यावरून ठराविक नेम धरून एकाच प्रयत्नात तिला रिंगणाबाहेर काढायचे. ती रिंगणाबाहेर निघाली तर सगळ्या कोया / पैसे / काचा आपल्या. फुटलेल्या बांगड्यांचे तुकडे गोळा करायला कुठल्या कुठल्या उकिरड्यांजवळ फिरायचो. आता आठवलं तरी अंगावर काटा येतो. ईईईई….. तेव्हा सगळं कमाल वाटायचं.

    आणि एक जबराट प्रकरण होतं टायर्स फिरवणे 🚲. जुने टायर्स घेऊन ते पळवत त्याची शर्यत लावायची! खूप धमाल यायची टायर्स पळवायला! ते टायर घेऊन मनमुरादपणे रस्त्याच्या, गटारीच्या कडेला, मोकळ्या मैदानात, गल्ली-बोळातून टायरवर काठीच्या टकटकाटात गोंधळ घालायचो. कधी चुकुन गटारीत वगैरे गेले तर हापशा बोरिंगवर निरमा लावून धुवायचो. त्याचे इतके वेड लागलेले असायचे त्याचे कि, घरातल्यांनी दुकानातुन सामान आणायला सांगीतल्यावरही टायर फिरवत फिरवत दुकानला जायचो! 🏂

    जिबली / ठिक्कर पाणी – फरशीचा / खापराचा तुकडा घेउन त्याला थुंकी लावुन या रकान्यात फेकायचा आणि एका बाजुने लंगडी खेळत जाउन तो पायानेच सरकावुन चौकटीच्या बाहेर जाईल अशा रितीने फेकायचा…रेषेवर पडला तर आउट! 🤸🏻

    बाकी लगोरी, लंगडी, कांदाफोडी, डोंगराला आग लागली पळा पळा पळा, पकडा-पकडी, सोनसाखळी, सुरपाटी, खाम्ब खाम्ब खाम्बोळी, शिवाजी म्हणतो, विषामृत, लंडन लंडन स्टॉप, दगड का माती, दोरीवरच्या उड्या.. 🤼‍♂️कितीतरी खेळ. आणि रुमालपाणी राहिलंच की!

    यापैकी कुठल्याही खेळाला अमूक एक जागा किंवा तमूक एक सेट अप अशा कुठल्याच नख-यांची गरज नव्हती.

    बैठ्या खेळांची तर बातच अलग! काचा कवड्या – हे ‘लूडो’चं देसी व्हर्जन! पाटाच्या उलट्या बाजुने खडुने किंवा कोळ्श्याने आखुन चिंचोक्याचे दोन भाग करुन खेळायचो.. 🎲

    पत्ते.. पत्त्यांमधले बरेच खेळ – झब्बु, बदाम सात, पेनल्टी, लॅडिज.. वक्कखई.. ते लाडू कळ्या.. अजुन कित्ती तरी… चॅलेंज! चॅलेंज – उचलेंज खेळताना तर काय वाट्टेल ती चोरगिरी करायचे दादा-ताई लोक. 😎

    नाव-गाव-फळ-फूल या यादीत आम्ही हळु हळु प्राणी, पक्षी, वस्तु, रंग, मेनू, नाटक / सिनेमा असं वाट्टेल ते जोडलं होतं. वह्याच्या वह्या भरल्या होत्या. आणि अजूनही भरतात बरं का! 📘🖊️

    नवा व्यापाराची सुरुवात तर त्याच्या पातळ नोटांना नुकत्याच संपलेल्या शाळेच्या वह्यांचे पुठ्ठे चिकटवून व्हायची. ⚖️मुंबई बघून माहित नव्हती तेंव्हा, पण सगळ्या भागांची नावे मात्र तोंडपाठ! दररोज एकेकाच्या घरी दुपारचे जेवण आटोपुन बसायचो ते थेट संध्याकाळ पर्यंत. खूप मजा यायची. त्यातील चिराबाजार, गेट वे ऑफ इंडिया, वाळकेश्वर, चौपाटी… अहाहा! बहार!

    राजा – राणी – चोर – शिपाई, फुली – गोळा, बिट्ट्या (ते वर टाकून काही काही म्हणून झेलायचा खेळ), पेनच्या रिकाम्या रिफीलनी साबणाच्या पाण्याचे फुगे, हिंगाच्या डब्याच्या झाकणांचे तराजु, नारळाच्या करंटीचे सुतळी ओवून केलेले फोन? क्रिएटिव्हिटीची कमाल! 🥇

    घर घर …. ह्या खेळाशिवाय लहानपण पुर्ण होउच शकत नाही.. घर बनवण्यासाठी चटइ, साडी, छत्र्यांचा वापर .. शेंगदाणा उघडुन त्यात गुळ घालून चिकटवलेले लाडू! ⛱️⛺

    आणि “डॉक्टर-डॉक्टर” 🧑🏻‍⚕️! म्हन्जे क्वॉय..! या लिजन्डरी खेळाबद्दल काय सांगू! भा. पो. करून घ्या!!😜

    दिवेलागणी झाली की जिन्यामधे बसून भुताच्या गोष्टी 🧞‍♀️🧟‍♂️🧟‍♀️आणि एकेक ऐकीव किस्से! रात्री लाईट गेल्यावर अंताक्षरी!🎼 नॉस्टॅल्जिया!

    तेव्हाचे खेळच असे असायचे की व्यायामाची गरज नव्हती पडत. “अयंऽऽ आपडे (प्रिया – याप्रि – आपडी… नावाच्या अपभ्रंषाचा अडनिडा प्रवास!), तुला मम्मीनं बोलवलंय”,🗣️ जोपर्यंत असा निरोप येत नसे, तोवर आमचं गावभर हुंदडनं चालूच असायचं.

    आंब्याच्या वाळवलेल्या कोया, चिंचोके, गोट्या, बिट्टया, कवड्या, काडेपेटीची चपटी करून साठवलेली पाकिटं, सॉफ्टड्रिन्कच्या बाटलीची चपटी केलेली झाकणं, रंगीबेरंगी बांगड्यांच्या काचा हाच लहानपणीच्या बँकबॅलन्स 💰 असायचा.

    ते ‘टॅम्प्लीज’ time please असतंय, ‘कटाप’ म्हणजे cut off असतंय, तर ‘नॉटॅठोम’ म्हणजे Not at Home असतंय, हे फार उशीराने समजलं.. समजेपर्यंत या क्रांतीतले सगळे भिडू कुठे तरी हरवून गेले. असलं बरंच काय काय आठवायला लागलं की स्क्रीन धूसर का होतो कळत नाही. 😭

    हे खेळ बनवण्यार्‍यांना आणि खिलाडूपणा शिकवण्यार्‍या सलाम! आणि ह्या सर्व खेळांनी बहरलेल्या लहानपणाला सलाम! 🙏🏻

    आजकालची पोट्टी, त्या बकवास व्हीडीओ गेमची बटने दाबत… नुसती घरी बसलेली दिसली कि डोक्याचा जयकांत शिक्रे 😡 होतो! आपणही आपल्या मुलांसाठी उरफोड करतोच ना? पण मग कुठे तरी सगळं ‘आउटफोकस’ का बरं होतंय?

    आजही मुलं हे खेळ खेळू शकतात. पण कदाचित आपणच त्यांना त्या खेळांपर्यंत न्यायला कमी पडतोय कि काय.. रिऍलिटी चेक व्हायलाच हवा! सुदैवानं खूप उशीर झालेला नाहीये. आताच हालचाल केलीतर ‘आम्ही बि घडलो तुम्ही बी घडाना’ म्हणता येईलच! 👍

    यातूनच आपले बालपण समृद्ध झाले होते. मग आता हा टाईमलेस 🔮 वारसा पुढच्या पिढीकडं पोहोचवायलाच हवा, नाही का? नुसतीच भौतिक सुखं पुरवण्यापेक्षा, हा सोनेरी ठेवा हस्तांतरित करूया! अल्ला मंतर… कोल्ला मंतर…म्हणत बिनपैशांचा तो आनंद घेऊया आणि देऊया सुद्धा! तीच खरी श्रीमंती! 💫